संविधान’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली सर्वोत्तम देणगी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे उद्घाटन संपन्न

सांगोला ( प्रतिनिधी ):-
भारतीय संविधान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली सर्वोत्तम देणगी आहे, या संविधानामुळेच एका सर्वसामान्य घरात जन्म घेतलेला माझ्यासारखा कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला. मीच नाही तर अनेकजण आज या संविधानामुळे आमदार, खासदार, मंत्री , मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही झाले, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सांगोला येथे गुरुवार दिनांक १० एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारक उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .
यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई, ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. समाधान आवताडे,आ. बाबासाहेब देशमुख, आ.राजू खरे, माजी आ. दिपकआबा साळुंखे , शिवसेना जिल्हाप्रमुख महेश साठे, शिवाजी सावंत, महेश चिवटे, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, शैला गोडसे, साईनाथ अभंगराव यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे “संविधान खतरे में है” असे म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांनीच खऱ्या अर्थाने त्यांच्या हयातीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव करण्याचे पाप केले. काँग्रेसने बाबासाहेबांना नेहमी त्रास दिला, म्हणूनच काँग्रेस म्हणजे जळक घर आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे.
राज्यात सत्ताधारी महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे सांगून शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आम्ही तब्बल ५ कोटी लोकांची कामे केली याचे आम्हाला समाधान आहे.
आमचे सरकार हे रिजन देणारे नाही तर डिसिजन देणारे सरकार आहे, असे आवर्जून सांगितले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने फेक नॅरेटीव्ह पसरविण्याचे काम केले पण त्याचा खोटारडा चेहरा जनतेसमोर आल्यानेच विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.
आम्ही लोकांची निस्वार्थ भावनेने काम केले म्हणूनच जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीचे विक्रमी आमदार निवडून दिले. मी सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्म घेतला, त्यामुळे माझ्यावर सातत्याने टीका केली जाते. पण मी टीकेला कामातून उत्तर देतो म्हणूनच मला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार आणि सन्मान मिळाले ते सर्व सन्मान आणि पुरस्कार मी जनतेला समर्पित करतो, असेही शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी ५० लाखाची तातडीचा निधी जाहीर –
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असतानाच माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिंदे यांच्याकडे एक चिठ्ठी पाठवली. या चिठ्ठीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, स्मारकासाठी अजून ५० लाखाची गरज आहे, असे नमूद करण्यात आले आहे.
त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, मी विमानात बसण्याच्या अगोदरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी अजून ५० लाख रुपयांच्या निधीचे पत्र तुमच्याकडे येईल ,असे जाहीर केली होते.
अर्ध्या तासात ५० लाख निधीची मंजुरी मिळाल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले